१/८/२०१९
सत्र ३२- महेश वझे
पुस्तक- रारंगढांग
लेखक - प्रभाकर पेंढारकर
एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग आणि दुसऱ्या
बाजूला वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये असलेली अनेक माणसं. मात्र ही सारी माणसं एकाच
जिद्दीची, काही ध्येय उराशी
घेऊन जगणारी. निसर्गात आणि या माणसांत, तर कधी या माणसांमाणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. अशाच
माणसांची व त्यांच्या संघर्षाची कथा म्हणजे रारंग ढांग.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, हिमालयात अत्यंत उंचावर रस्ते बांधणे व त्याची देखभाल
करणे ही कामे करते. माणसांना व यंत्रांनाही थकवणारी उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी निसर्ग, विलक्षण थंडी, हिवाळ्यात रस्त्यावर साठणारे बर्फ,अकल्पित लॅंडस्लाईडस व या सर्वांचा मानवी मनावर
होणारा परिणाम या सर्वांना गुंफणारी ही कथा.अत्यंत प्रतिकूल हवामान व सैन्याच्या
करड्या शिस्तीतही मनात अंकुरणारी हळूवार प्रेमभावना, माणूसकीचा ओलावा, वडील व मुलाच्या
नात्यातील हळूवार पदर अशा अनेक अंगांनी उलगडणारी कथा.
‘मी कोण?’ हा विश्वातला सगळ्यात गहन प्रश्न. माझ्या जगण्याचे,माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन काय या प्रश्नाचे उत्तर
शोधणारा माणूस, काही गोष्टी
झाल्याच पाहिजेत यासाठी निर्धाराने उभा राहतो, तत्वांसाठी, कोणतीही तडजोड न
करता झगडतो. अशाच माणसाची ही गोष्ट. एका बाजूला सैन्याची शिस्त आणि दुसऱ्या बाजूला ह्या शिस्तीत न बसणारी पण मनोमनी पटलेल्या स्वत:च्या कर्तव्याची जाणीव अशा द्वंद्वात
अडकलेल्या विश्वनाथची ही कथा.
इतरांच्या कथेत स्वतःला शोधण्याचा प्रवास फार मनोहारी
असतो. रारंगढांग हे या अर्थाने महत्वाचं पुस्तक.
वझे सर आतून बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत. उत्कट, भावनाशील मन, तरीही बुद्धीवादी असं दुर्मिळ मिश्रण असलेले वझे सर या पुस्तकावर बोलले आहेत!

No comments:
Post a Comment