Thursday, November 9, 2023

सत्र २४५ : बाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास (संपा.- अंबरीष मिश्र) : सायली टिळक

०२।११।२०२३

सत्र २४५वे:

पुस्तक : बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास

संपादक : अंबरीष मिश्र

सादरकर्त्या : सायली टिळक



आधुनिक  मराठी रंगभूमीच्या विशेषतः गद्य रंगभूमीच्या वाटचालीत वेगवेगळ्या काळात वेगवेगळी अनेक वळणे येत राहिली. यातलाच एक महत्त्वाचा  टप्पा म्हणजे प्रायोगिक रंगभूमी.  साधारणपणे  समांतर चित्रपट -आर्ट फिल्म- चळवळीच्या काही काळ आगेमागे ह्या रंगभूमीचा एक महत्त्वाचा अध्याय रचला गेला. यातील महत्त्वाचे योगदान देणाऱ्या  संस्था वा व्यक्ती अथवा संस्थात्मक व्यक्ती म्हणजे बाई. नवीन पिढीला आदर्शवत असलेल्या अनेक अभिनयनिपुण दिग्गजांची एक फळी घडवणाऱ्या विजया मेहता.आजचे अभिनयाचे मापदंड असे  अनेक अभिनेता-त्री बाईंबाबत किती किती सांगू तुला याप्रकारे सांगू लागतात..त्यात अतिशयोक्ती टाळून हातचे न राखता वस्तुनिष्ठपणे सांगूनही काहीतरी उरतेच. रंगभूमीच्या सर्व अंगांचा कसून अभ्यास व जवळजवळ सर्वच पैलूंवर समान प्रभुत्व. कोणत्याही अभिनिवेशाविना सादरीकरणात नवनवीन आयाम व पायंडे पाडले. तेही  मूळ भारतीय परंपरेची कास न सोडता. वा  उगाच मेलोड्रामॕटिक न होता. कोणत्याही विषयावरील संहितेला यथायोग्य न्याय देण्याची सहजसिध्द क्षमता असणाऱ्या बाईंनी रंगायन संस्थेतून केलेले अनेक प्रयोग अचंबित करतात. नाटकाप्रमाणेच चित्रपटांवरही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. बाईंनी घडवलेल्यांपैकी  अनेक प्रथितयश नाट्यकर्मींनी लिहिलेले, बाईंना दिग्दर्शन केलेल्या पुलंसारख्याने, श्री पुं सारख्या  सहकाऱ्याने लिहिलेले असे पूर्वी प्रसिद्ध झालेले लेख संपादित करून पुस्तक तयार केलंय तितक्याच सिध्दहस्त अंबरिश मिश्रांनी. अशा ह्या पुस्तकावर यावेळचे शब्दांगणचे दिवाळीपूर्व सत्र सादर करतायत,शैक्षणिक मानसशास्त्र तज्ज्ञ, अनुभवी व्यावसायिक समुपदेशक अश्या बहुआयामी तसेच यंदाच्या साहित्ययात्री २०२३ स्पर्धेच्या उपविजेत्या ठरलेल्या संघाच्या सायली टिळक.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४४ : विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख) : मुकुल आव्हाड

२६।१०।२०२३

सत्र २४४वे:

विषय : विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख )

सादरकर्ते : मुकुल आव्हाड



हिंदू-मुस्लिम संबंध, इस्लाम, सावरकर, भारताची फाळणी, गांधीहत्या, १८५७ चा जिहाद/स्वातंत्र्यसमर अशा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक विषयांवर बुद्धिवादी, प्रगल्भ आणि तितकंच वादळी लेखन करणारं व्यासंगी, तत्त्वज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे डॉ शेषराव मोरे. महाविद्यालयात प्राध्यापकी करत असताना अभ्यास आणि वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने चाळीशीतच निवृत्ती स्वीकारून रोज १७-१८ तास वाचन सुरू झालं आणि त्या वाचन, चिंतनातून अक्षरशः एकेका रत्नासमान ग्रंथ जन्माला आले."सावरकर व कुरुंदकर यांच्याकडून आम्ही बुद्धीवाद शिकलो... शब्दप्रामाण्य नव्हे!" हे शेषरावांचं वाक्य त्यांच्यातल्या बुद्धीवाद्याचं निदर्शक आहे.एवढं विविधांगी लेखन करताना संदर्भ आणि पुराव्यांची छाननी करून सत्य आणि वस्तुस्थिती ठामपणे मांडणं हे शेषरावांचं ब्रीद होतं. अर्थात हे करत असताना अनेक लोकांना अप्रिय वाटेल असं किंवा ते दुखावले जातील असं लेखन होणं हे स्वाभाविकच होतं. शेषरावांनी अनेक नियतकालिकं, मासिकांमध्ये लिहिलेल्या अशाच काही अप्रिय वाटणाऱ्या परंतु परखड मतं मांडणाऱ्या लेखांचे संग्रह म्हणजे 'अप्रिय पण' आणि 'विचारकलह' आणि हाच विषय आहे आपल्या येत्या गुरुवारच्या शब्दांगणच्या सत्राचा. शेषरावांच्या विचारांवर सत्र घेणं हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा कमी नाही हे ज्यांनी शेषराव वाचलेत ते नक्कीच मान्य करतील. हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याच शब्दांगण मधील अतिशय अभ्यासू आणि उत्तम वाचक असलेला मुकुल आव्हाड. ज्यांनी शेषराव वाचले आहेत त्यांनी पुनर्नुभूती चा प्रत्यय घेण्यासाठी, ज्यांनी वाचले नाहीयेत त्यांनी का वाचायला हवेत हे समजून घेण्यासाठी आणि ज्यांना वाचायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर वाचायला सुरुवात करावी यासाठी या सत्राला उपस्थित राहणं अनिवार्य आहे!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४३ : टाटा स्टोरीज् - हरीश भट : मंगेश देशपांडे

 १९।१०।२०२३

सत्र २४३वे:

पुस्तक : टाटा स्टोरीज्

लेखक : हरीश भट

सादरकर्ते : मंगेश देशपांडे



नमस्कार ! राष्ट्रउभारणीत राजकीय व्यवस्थेच्या बरोबरीने वस्तुतः उद्योगपतींचाही अजोड सहभाग असतो. भारतीयांसाठी अशा एका उद्योग वा उद्योगसंस्थेचे नाव घ्यायचे झाल्यास, अपार आदराने  नि विश्वासाने प्रत्येक भारतीयाच्या ओठी येईल ते नाव म्हणजे टाटा. बदलत्या  काळाबरोबर  मूल्यव्यवस्थेतले बरेच काही ढासळले तरी हा विश्वास तसूभरही न हटता, वाढला. टाटा समूहाच्या विविध गुणांची चर्चा नेहमीच होत असते. नि त्याविषयी ह्याआधी आलेल्या पुस्तकांतून वा अन्यत्र आपल्यापैकी अनेकांनी  वाचलेले असेलही. उदा. कार्यशैली, कार्यपरंपरा (Legacy), सामाजिक बांधिलकी.  टाटांविषयी कधी काही उणे-अधिक ऐकले, तर चटकन कोणालाही विश्वसनीय वाटले नाही. छोट्या-छोट्या कथा-दंतकथा अन् त्याही विश्वसनीयरीत्या पसरणे, पसरविल्या जाणे, हेही त्यांच्या यशाचे एक गमकच.मग कधी भारतरत्न जे. आर. डीं.नी कोणा पादचाऱ्याला दिलेली लिफ्ट वा पंडित नेहरूंना दिलेला सल्ला असेल. किंवा शत्रुराष्ट्र म्हणून रतन टाटांनी व्यावसायिक प्रस्तावच मांडायला दिलेला नकार असेल. किंवा २६/११ च्या ताज हल्ल्यानंतर  टाटांनी दाखवलेली माणुसकी व सहृदयता व त्यातून  केवळ एका व्यक्तिचाच नव्हे, तर  संपूर्ण टाटा समूहाचा दृग्गोचर झालेला उदारमनस्क दृष्टिकोन.म्हणूनच मग, जे. आर. डीं.ना भारतरत्न दिल्याबद्दल व रतन टाटांना  भारतरत्न देण्याची मागणी करताना समस्त भारतीयांच्या मनात एकाच आत्मीयतेने आनंदाचे भाव उमटतात. अश्या ह्या टाटा समूहाविषयी, १५च्या आसपास पुस्तके प्रकाशित होऊनही नवनव्या लेखकांना जसे लिहावेसे वाटते तसेच टाटामध्ये ३० हून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या हरीश भटांसारख्या प्रथितयश लेखकालादेखील. CEO सारख्या विविध उच्च पदांसह, टाटाच्या शिखर संस्थेतील उच्च पदस्थांपैकी एक असलेल्या हरीश भट यांच्याकडील अनेकानेक कथा-कहाण्यांचा साठा सांगण्याचा मोह त्यांना न झाला  तरच नवल. त्यांच्या लेखनाविषयी यापूर्वीच्या पुस्तकांतून ते अनेक वाचकांना सुपरिचित झालेतच. आजच्या शब्दांगणच्या सत्रात हरीश भट लिखित टाटा स्टोरीज् विषयी सांगणार आहेत शब्दांगण परिवाराचे हितचिंतक सदस्य, या आधीही आगळ्यावेगळ्या धाटणीच्या पुस्तकांवर व लेखकांवर सत्रे घेतलेले चोखंदळ वाचक मंगेश देशपांडे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४२ : सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि इतर विज्ञानकथा : क्षितिज देसाई

१२।१०।२०२३

सत्र २४२वे:

विषय : सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि इतर विज्ञानकथा

सादरकर्ते : क्षितिज देसाई



जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर किंवा प्रसंगी फिलिप के डिक, आयझॅक असिमोव यांसारख्या महान वैज्ञानिक/विज्ञान कथाकारांनी आपलं बालपणीचं वाचनविश्व समृद्ध केलेलं असतं. त्या विज्ञानकथा वाचत असताना आपणही असं काहीतरी लिहावं असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात निदान एकदा तरी नक्की डोकावून गेलेला असतो. विज्ञानकथांच्या विश्वात हरवून गेलेलो असताना आपल्या कल्पनाशक्तीला फुटलेले धुमारे आपल्या सर्वांना आठवत असतीलच. काही व्यक्तींनी मात्र स्वतःला मनातल्या मनात कल्पना रचण्यापुरतंच मर्यादित न ठेवता, त्या फुटलेल्या धुमाऱ्यांवर प्रत्यक्ष काम केलं. असाच एक युवा, सशक्त विज्ञानकथाकार, आपला डोंबिवलीकर असलेला क्षितिज देसाई या वेळच्या शब्दांगणच्या सत्रामधून आपल्या भेटीला येतोय. 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' हा त्याचा विज्ञानकथा संग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. हा कथासंग्रह, एकूणच विज्ञानकथा, त्या कशा सुचतात, कशा लिहाव्यात, त्याचा स्वतःचा लेखनप्रवास आणि लेखनानुभव अशा विविध गोष्टींवर क्षितिज श्रोत्यांशी गप्पा मारणार आहे. आपण सर्वांनीच आणि विशेषतः विज्ञानकथाप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावं असं हे सत्र ! नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २४१ : जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली : मनीष टिळक

 ०५।१०।२०२३

सत्र २४१वे:

पुस्तक : जंगलाचं देणं

लेखक : मारुती चितमपल्ली

सादरकर्ते : मनीष टिळक



नमस्कार! सध्या सर्वत्र बदलत्या हवामानाविषयी खूप मोठ्या प्रमाणावर बोलले जातंय. आपण त्याचे चटके आणि धक्के अनुभवतोय. वाढते तापमान, घटते पर्जन्यमान, बदलते ऋतुमान हे सगळे निसर्गात मानव निर्मित किंवा मानवप्रायोजित हस्तक्षेपांमुळे होतंय असंही ऐकू येतंय. यात मोठ्या प्रमाणात बदल होतायत ते वृक्षराजींमध्ये. जंगलांच्या आकारांमध्ये, क्षेत्रफळांमध्ये. जंगले ही तोडल्यानंतर आणि साफ झाल्यानंतर बोलण्याची व आरडा ओरडा करण्याची बाब नसून ती आस्तित्वात असताना हिरवीगार वनराजी म्हणून आपले वैभव मिरवत असताना त्यांचा आनंद लुटायला हवा. निसर्ग आपल्या दोन्ही हातांनी यथेच्छ आणि भरभरून दान देत असताना आपणच तिथे न पोचता जर मेट्रो आणि कॉंक्रीटच्या जंगलात रमत राहिलो तर आपल्यासारखे करंटे आपणच. जंगल प्रेमी, भटके, पक्षीनिरीक्षक, वन्यजीव रक्षक, वनरक्षक हे तिथे जातातच आणि जात राहतीलच. पण आपल्यासरख्या सामान्य माणसाला त्या जंगलात जायला उद्युक्त करायला कोणी तरी एखादी कळ फिरवावी लागते. अश्या एक नव्हे अनेक कळी फिरवणारे, जंगलांवर प्रेम करणारे आणि त्यावर लेखन करून त्या लेखनाचा पुरेपुर आनंद वाचकांना देणारे लेखक आज आपल्याला मराठीत वाचायला मिळतात. ह्या सर्वांमध्ये ज्यांचे मानाचे स्थान आणि पान आहे असे एक लेखक म्हणजे  मारुती चितमपल्ली!  जंगल आपल्याला काय नव्हे, काय काय देते, किती किती देते, कसे कसे देते ह्या सर्वांचा यथोचित धांडोळा घेणारे, जंगलांचा  शास्त्रशुद्ध  अभ्यास व संवर्धन करणारे वनरक्षक  *श्री.मारुती चितमपल्ली! *ह्यांच्या जंगलाचे देणे ह्या पुस्तकाविषयी आपल्याला यथायोग्य, सांगोपांग विवेचन करणारे आजचे वक्तेही तितकेच तोलामोलाचे आहेत. शब्दांगण परिवाराला  परिचित असणारे, मनीष टिळक !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २४० : सनातन संस्कृतीच्या प्रदक्षिणेच्या वारसा - तत्त्वमसि - ध्रुव भट्ट : हेरंब ओक

१४।०९।२०२३

सत्र २४०वे:

विषय : सनातन संस्कृतीच्या प्रदक्षिणेचा वारसा - तत्त्वमसि

पुस्तक : तत्त्वमसि

लेखक : ध्रुव भट्ट

सादरकर्ते : हेरंब ओक



शब्दांगण समूहामध्ये दर वर्षी वाचनशतक पूर्ण करणारं अर्थात शंभर अभ्यासपूर्ण पुस्तके वाचणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे हेरंब दादा ! आज ऑनलाईन माध्यमातून तत्त्वमसि या पुस्तकावर ते बोलणार आहेत. नर्मदा परिक्रमा हा आपल्यापैकी अनेकांसाठी जिव्हाळ्याचा, कुतूहलाचा आणि भक्तीचा विषय असतो. नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगणारी अनेक पुस्तकं ही आपण वाचतो. पण परिक्रमे पलीकडचे नर्मदे काठचे जग, समाजजीवन, संस्कृती या सगळ्याचा उहापोह करणारी कादंबरी म्हणजे तत्त्वमसि ! मूळ भारतीय वंशाच्या पण अमेरिकास्थित तरुणाला नर्मदा मैय्या कशी दिसते, तिथलं आदिवासी जीवन, चालीरीती संस्कृती या सगळ्याचं दर्शन नेमकं कसं घडतं याचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात केलेलं आहे. ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या आणि अंजली नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी आजच्या सत्राला नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २३९ : साहित्ययात्री अनुभव कथन : स्पर्धक आणि आयोजक

०७।०९।२०२३

सत्र २३९वे:

विषय : साहित्ययात्री अनुभव कथन

सादरकर्ते : स्पर्धक आणि आयोजक



मंडळी.. आपल्या साहित्ययात्री या स्पर्धेची दखल माध्यमांनी घेतली. ही स्पर्धा  आयोजक आणि स्पर्धक दोघांसाठीही भरभरून देणारी होती. याचा पुनर्प्रत्यय म्हणून आपलं शब्दांगणचं उद्याचं सत्र खास साहित्ययात्रीसाठी समर्पित! आणि त्याचं तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण... उद्याच्या सत्रात आयोजक आणि स्पर्धक दोघांचेही अनुभव कथन होईल त्यासोबतच अनुभवलेले किस्से, आलेली आव्हानं, अभिप्राय, आयोजकांसाठी सूचना यावरही चर्चा होईल. साहित्याशी निगडित स्पर्धा आयोजित करताना घडणारे किस्से आणि येणारी आव्हानं जाणून घेण्यासाठी आणि साहित्ययात्रीच्या स्वरुपाची ओळख करुन घेण्यासाठी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



Thursday, October 26, 2023

सत्र २३८ : गालिबला जाणून घेताना : मकरंद सावंत

३१।०८।२०२३

सत्र २३८वे:

विषय : गालिबला जाणून घेताना

सादरकर्ते : मकरंद सावंत



काव्यशास्त्रविनोदेन 

कालो गच्छति धीमताम् ।

व्यसनेन च मूर्खाणां, 

निद्रया कलहेन  वा  ।। 

बुद्धिमान माणसे काव्य, शास्त्र आणि साहित्य यांच्या अध्ययनात वा अध्यापनात आपला  वेळ  व्यतीत करण्यात धन्यता मानतात. तर मूर्ख माणसे वेगवेगळी  व्यसने करण्यात, वितंडवाद घालण्यात वा झोपेत..! संस्कृत सुभाषिते ही अशी अल्पाक्षरी पण बहुमूल्य व आशयघन काव्यासारखी. कवींची हीच तर खरी ताकद व खासियत. मग ते वर्डस्वर्थचे डॕफोडिल्स असो, फ्राॕस्टचे रोड नाॕट टेकन असो, साहिर अथवा अनेकानेक उर्दू शायरांची शायरी. उर्दू शायरी म्हटल्यावर  गा़लिबचा जि़क्र होणारच. 

जे शंभर नंबरी अस्सल कलावंत असतात  म्हणजे पुलं, आचार्य अत्रे, शंकर जयकिशन, लता मंगेशकर, साहिर लुधियानवी अश्यांच्याच नावे खऱ्या अथवा ऐकीव  दंतकथा पसरतात.  गा़लिब, मिर्जा़ गालिब़ ह्या दोन्ही नावांनी सर्वपरिचित शायराच्या नावेही अशा अनेक कथा पसरल्यात.  गा़लिब म्हटल्यावर आठवते,  गा़लिबची शायरी. दिल बहलाने के लिए  खयाल अच्छा है गालिब सारखे गा़लिबचेच शेर. आणि सुरैय्याचा मिर्जा़ गा़लिब चित्रपट हो सुरैय्यासाठी बघितलेला. गा़लिब हे नाव उर्दू  शायरीसाठी इतके अहम का ?त्याचे उत्तर यात मिळते. गा़लिबचा इंतकाल झाल्यानंतर  शे-सव्वाशे वर्षांनी गुलजारनी  दूरदर्शनसाठी केलेल्या व नासिरुद्दिनने गा़लिबची भूमिका केलेल्या मालिकेचे शीर्षकगीतच गालिब़ची महती सांगणारे. 

हैं और भी दुनिया में,

सुख़न-वर बहुत अच्छे।

कहते हैं कि 'ग़ालिब' का है 

अंदाज़-ए-बयाँ और ।।

गा़लिबच्या शायरीचे पहेलू  असे काय आहेत की दीडेकशे वर्षांनीसुध्दा त्या शायरीबाबत आपल्याला वाचावंसं  ऐकावंसं अन् त्याहूनही समजून घ्यावंसं वाटतंय.. 

याचसाठी अश्या सर्व शायरी प्रेमींनी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, August 25, 2023

सत्र २३७ : India, Bharat and Pakistan - जे साई दीपक : शशांक कुंभारे

२४।०८।२०२३

सत्र २३७वे:

पुस्तक : India, Bharat and Pakistan

लेखक : जे साई दीपक

सादरकर्ते : शशांक कुंभारे



आज शब्दांगण मध्ये सादर होणारं पुस्तक म्हणजे  जे. साई दीपक यांच्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरं “इंडिया, भारत अँड पाकिस्तान”. भारताच्या इतिहासाचा वेगळ्या संदर्भातून मागोवा घेताना लेखक यामध्ये वसाहतवाद, भारतीय सभ्यतेची पाळंमुळं यांच्या अनुषंगाने  1905 ते 1924 या काळात घडलेल्या घटनांचं विश्लेषण करत जातात. आपल्या तर्कशुद्ध मांडणीसाठी प्रसिद्ध असलेले जे. साई दीपक आपल्या इतिहासावर प्रभाव पडणाऱ्या या आणि आधीच्या काळातील वेगवेगळ्या घडामोडींचा संदर्भ देत एक वेगळी बाजू समोर घेऊन येतात. 

भारताच्या संदर्भातील कुठलीही घटना आपल्यासाठी महत्वाची असते तसंच आपल्या गौरवशाली इतिहासाचा नवीन पैलू समजून घेणंही तितकंच महत्वाचं ! ही मांडणी आपल्यासमोर आज शशांक कुंभारे करणार आहे. ती ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आवर्जून ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Wednesday, August 23, 2023

सत्र २३६ : कवितेतून जाणवलेल्या अरुणाताई : तेजस्विनी गांधी

१७।०८।२०२३

सत्र २३६वे:

विषय : कवितेतून जाणवलेल्या अरुणाताई 

सादरकर्त्या : तेजस्विनी गांधी



नमस्कार !

डाॕक्टरचा व्यवसाय  पुढली पिढी डाॕक्टर होऊन चालवते. अशी पितृव्यवसायाची परंपरा  सर्वच  क्षेत्रातील कलावंतांना वा कलांना लागू होत नाही. त्यातून साहित्यिकांचे तर खूप वेगळे असते. आणि कवी अथवा चिकित्सक - संशोधक यांचे तर  त्याहून निराळे असते. मराठी साहित्यातील संत साहित्याच्या अभ्यासकांच्या, काव्यमंडळ चालवणाऱ्या कविच्या (रा. चिं. ढेरे) थोर परंपरा लाभलेल्या व्यक्ती, ज्या घरात भिंतीऐवजी पुस्तकेच पुस्तके असतात, अशा घरात जन्मलेल्या व्यक्ती, यांच्या हाताला सहसा साहित्याचे वेगळे बोट असते. 

आपले कविप्रकृतीचे रंग व रस केसरीत कविता छापून आलेल्या शाळकरी वयातल्या अरुणाताईंनी दर्शविले. होय. अरुणा ढेरे.९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, आपल्या वाङ्मयीन प्रेरणा, प्रतिभा, त्यांची बलस्थाने व मर्यादा याबाबत सजगपणे विचारशील असलेल्या, चिंतनशील,  वैचारिक, लेखिका. कथा-काव्य तसेच संशोधनाची परंपरा राखत ६ काव्यसंग्रहांसह

चाळीसेक पुस्तकांची ग्रंथसंपदा नावे असणाऱ्या. आपल्या साहित्यातून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करताना स्त्रीविषयक जाणीवा सतत जिवंत असलेल्या. वैचारिक लिहितानाही, परमेश्वराच्या करुणेचा दीप शब्दांतून येण्याचे मागणे आपल्या करुणाष्टकातून अरुणा ढेरे त्याच्याकडे मागतात.  

अरुणाताईंच्या कवितांवर या गुरुवारी शब्दांगणचे सत्र घेतायत तळेगाव येथे राहणाऱ्या, साहित्याची अभिरूची जोपासणाऱ्या आणि आपल्या तरल कवितांमधून तसेच अभ्यासू वक्तृत्वामधून वेळोवेळी व्यक्त होणाऱ्या तेजस्विनी गांधी ! अरुणाताईंच्या रसाळ काव्याचं तितकंच रसपूर्ण विवेचन नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३५ : विजय तेंडुलकर - नाटक आणि माणूस : मुकुल आव्हाड

१०।०८।२०२३

सत्र २३५वे:

विषय : विजय तेंडुलकर - नाटक आणि माणूस 

सादरकर्ते : मुकुल आव्हाड



नमस्कार ! 

तेंडुलकर म्हटल्यावर "सचिन ना?" असेच प्रत्युत्तर येण्याचा एक काळ आपण अनुभवलाय. पण त्याच्या खूप आधी,  मराठी माणसाच्या  भावविश्वात, दुसरे एक प्रत्युत्तर ओठावर व मनावर रुंजी घालत असे- विजय तेंडुलकर! कधी लेखक म्हणून मग कधी  नाटककार म्हणून पुढे पटकथाकार म्हणूनही. सामाजिक भान जपणारे. एका संवेदनशील अभिनेत्रीचे वडिल अशा अनेक परीने ओळख असलेले. 

वेळोवेळी त्यांनी स्वतःची मते मांडली. त्यातून  वादही झाले. तेंडुलकर आणि वाद किंवा तें म्हटले की वाद असेही वाटणारे त्यांचे चाहते अथवा विरोधक होते. आहेत. पण  या सर्वांच्या पलीकडे  एक प्रतिभाशाली व संवेदनशील नाटककार ही त्यांची छबी व त्यांचे महत्त्व  कधीच कोणी नाकारू शकणार नाही. 

नाटककार व माणूस म्हणून ते कसे होते?  किंबहुना,  प्रतिभाशाली नाटककार हा माणूस म्हणून कसा असतो? का तसा असतो? त्या लेखनामागची प्रेरणा काय? हे सारे कोठून येते ? अशा प्रश्नांचा अभ्यास करणारा एक अभ्यासू तरुण मुकुल आव्हाड या विषयी सत्र सादर करतोय.

 यापूर्वीही अनेकदा वेगवेगळ्या सत्रांतून आपला बहुविध विषयांचा अभ्यास शब्दांगणच्या माध्यमातून मांडणारा शब्दांगण परिवाराला परिचित चेहरा मुकुल या गुरुवारचे सत्र सादर करतोय. नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, August 4, 2023

सत्र २३४ : इन द नेम ऑफ ऑनर - मुख्तार माई : निनाद जोशी

०३।०८।२०२३

सत्र २३४वे:

पुस्तक : इन द नेम ऑफ ऑनर 

लेखिका : मुख्तार माई (अनुवाद - उल्का राऊत )

सादरकर्ते : निनाद जोशी



मुख्तारन बीबी जिला आज *मुख्तार माई* म्हणून ओळखलं जातं, तिच्यावर आजचं सत्र होतंय. गॅंग रेप झालेल्या स्त्रीचा न्यायासाठी लढा हा कोणत्याही समाजात आव्हानात्मकच असतो. एखादी फुलन देवी निघते जी व्यवस्थेलाच झुगारून टाकते, पण एखादी मुख्तार माई सुद्धा निघते जी व्यवस्थेच्या चौकटीत न्याय मिळवण्याचा प्रयत्न करते, ते ही सर्वोच्च न्यायालयात जात. पाकिस्तान मध्ये घडलेली ही घटना! आपल्या देशाची बदनामी होऊ नये म्हणून मुशर्रफ सरकार ने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी आणली होती.
या मुख्तार माई ची कथा आजच्या शब्दांगण सत्रात मांडणार आहे *निनाद जोशी* . विवेकानंद सेवा मंडळाचा संवेदनशील कार्यकर्ता, उगवता प्रवचनकार. आजचं सत्र चुकवू नये असं नक्की या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३३ : जेन ऑस्टिन - स्थानिक तरी वैश्विक लेखिका : रेणू गांधी

२७।०७।२०२३

सत्र २३३वे:

विषय : जेन ऑस्टिन - स्थानिक तरी वैश्विक लेखिका

सादरकर्त्या : रेणू गांधी



जेन ऑस्टिन ने अवघी सहा प्रसिद्ध पुस्तके लिहिली. अवघी याच शब्दाला आक्षेप घ्यावा अशी तिची उंची. आपल्या सामान्य अनुभवांकडे बघताना त्यातून तिने मनुष्य स्वभावाचे एवढे अचूक निरीक्षण केले आहे कि तिचे लेखन वैश्विक बनते. म्हणूनच जेन ऑस्टिन केवळ ब्रिटिश किंवा युरोपियनच नव्हे तर भारतीय वाचकांना सुद्धा मोहिनी घालते. तिच्या नायिकांनी *रेणू गांधी* यांच्या सारख्या चोखंदळ आणि मनस्वी व्यक्तिमत्वाला प्रभावित केले नसते तरच नवल. जेन ऑस्टिन आवडायला सुद्धा एक प्रकारचे बंडखोर व्यक्तिमत्व लागते का असा प्रश्न मला पडतो. तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना जेन पुढे मागे पाहत नाही.अनेक अंगांनी आजचे सत्र ऐकायला हवे असे. आज पाऊस खूप आहे. पण आजचे सत्र ऑनलाईनच होतंय. बिलकुल चुकवू नका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३२ : छंद कवितेचा - मराठी आणि इंग्रजी काव्यातील छंद-वृत्तांची ओळख : रिद्धी करकरे

२०।०७।२०२३

सत्र २३२वे:

विषय : छंद कवितेचा : मराठी आणि इंग्रजी काव्यातील छंद-वृत्तांची ओळख

सादरकर्त्या : रिद्धी करकरे



नमस्कार !
सर्वसाधारणपणे, आपल्यापैकी प्रत्येकाला
गद्यापेक्षा पद्याचेच बाळकडू मिळते.
अगदी तान्ह्या बाळाला खेळवताना म्हटली जाणारी बोलगाणी, बडबडगीते, झोपताना म्हटली जाणारी अंगाईगीते ही त्याचीच उदाहरणे. अश्या ह्या सगळ्या गाण्यांचे शब्द काहीही असले तरी त्या सर्व गाण्यांना विशिष्ट चालीत म्हणता येते. आणि या सर्वच
 गाण्यांतील सर्वच शब्द अर्थपूर्ण असतातच असेही नाही. काही वेळेला पादपूरणार्थ अशीही त्यांतील शब्दरचना असते.
कारण शब्दापेक्षा त्यातील तालाला वा ठेक्याला खरे महत्त्व असते.
अनेकांचे निरीक्षण तर असे आहे की, अंगाई गीतातील गीतापेक्षा त्यातल्या ताल वा ठेक्यामुळे ते मूल झोपते.
या तालाचा, ठेक्याचा संबंध कवितेच्या चालीशी असतो.
मराठी काव्यामध्ये, ज्याप्रमाणे अश्या तालबध्द, चालबध्द रचनांची मोठी परंपरा आहे तशीच वृत्तबध्द आणि छंदोबध्द रचनेचीही.
हे सारे सांगायचे कारण की, आजचे *शब्दांगण* चे सत्र *मराठी व इंग्रजी काव्यातील छंद आणि वृत्ते*.
अन् ते, सत्र घेणार आहे सूत्रसंचालिका म्हणून स्वतःची ओळख असणारी, मराठी बरोबरच इंग्रजी , संस्कृत अशा विविध भाषांची अभ्यासक व बहुविध वाचन असलेली रिध्दी करकरे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३१ : मर्मभेद - शशी भागवत : मुकुंद करकरे

१३।०७।२०२३

सत्र २३१वे:

पुस्तक : मर्मभेद

लेखक : शशी भागवत

सादरकर्ते : मुकुंद करकरे



नमस्कार
नवरसांमधील एक अतिशय गुंगवून ठेवणारा, विस्मयचकित करणारा रस म्हणजे अद्भुत रस ! या अद्भुत रसावर आधारित कथानकं ही आबालवृद्ध सर्वांनाच प्रिय असतात. मग ते J K Rowling च Harry Potter असू दे किंवा अस्सल भारतीय संस्कृतीत रुजलेली वेताळ पंचविशी ! मध्यंतरीच्या काळात आलेला बाहुबली हा चित्रपटसुद्धा अशाच अद्भुतरम्य कथानकाचे एक उदाहरण ! साधारण शतकभरापूर्वी मराठी कादंबरी विश्वातही अशा नवलकथा येऊन दाखल झाल्या. नाथमाधव लिखित वीरधवल किंवा गो ना दातार लिखित कालिकामूर्ती यासारख्या कादंबऱ्यानी विशाल प्रासाद, राजे- सरदारांची कृष्णकृत्ये, घनदाट अरण्यप्रदेश, गूढ भुयारं, अतृप्त प्रेतात्मे आपल्या भरजरी भाषेतून मूर्तिमंत उभे केले. याच मांदियाळीतील एक दर्जेदार कादंबरी म्हणजे *शशी भागवत लिखित मर्मभेद* ! सूर्य प्रस्थाच्या विशाल साम्राज्यातील कपटी सरदार कृष्णांताचा मर्मभेद कसा होतो ? हे रंगवून सांगणारी ही कादंबरी ! गुप्तहेरांच्या, नव्हे नव्हे ऐयारांच्या मार्फत गुपितं बाहेर काढणारी अशी ही कादंबरी ! विविध भूप्रदेशातून फिरवून पराक्रमांची चित्रं रंगवणारी अशी ही कादंबरी ! आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेच्या खानदानी शब्दलावण्याने नखशिखांत मढवलेली अशी ही एक अप्रतिम कादंबरी आहे.

चोखंदळ वाचक आणि तथ्यप्रचुर व रंजक पद्धतीने विषय मांडणारे *श्री. मुकुंद करकरे* आजच्या सत्रामध्ये मर्मभेदाचे रहस्य सांगतात का हे जाणून घेण्यासाठी नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २३० : आषाढस्य प्रथम दिवसे : नीरज दांडेकर

०६ ।०७।२०२३

सत्र २३०वे:

विषय :आषाढस्य प्रथम दिवसे

सादरकर्ते : नीरज दांडेकर



नमस्कार !
नुकताच पावसाळा लागलाय. म्हणजे खरोखरच पाऊस नुसता लागून राहिलाय. बरसणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणी जागृत करतो. यात
गतभेटीच्या स्मृती असतात तर कधी
भेटीची आतुरता असते तर कधी विरहाची व्याकुळता.
पाऊस, ढग नि विरह हे तिन्ही एकत्रितपणे वाचल्यावर साहित्यप्रेमींना हटकून स्मरते यक्षाची विरहातील कविता-काव्य म्हणजेच संस्कृत साहित्यातील अजरामर कलाकृतींपैकी कालिदासाचे मेघदूत.
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कवींनी याचे रुपांतर मराठीत करून मराठी वाचकांची खूप मोठी सोय केलेली आहे.
विक्रमादित्य राजाच्या दरबारात राजकवी असलेला कालीमातेचा भक्त कालिदास. हाताच्या बोटाला अनामिका हे नामाभिधान प्राप्त होण्यास कारण कालिदास. अश्या व याहूनही काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ऐकायला व संस्कृत काव्याविषयी जाणून घेऊ या आजच्या शब्दांगणच्या सत्रात.
नुकत्याच सुरू झालेल्या आषाढ मासाचे औचित्य साधून आज गुरुवारी शब्दांगणचे सत्र *आषाढस्य प्रथम दिवसे* सादर करतायत आपल्या सर्वांना संस्कृत व मराठी काव्याचे एक व्यासंगी म्हणून परिचित असलेले श्री. नीरज दांडेकर.
तर मग अशा महाकवीचे स्मरण आणखी चिरस्मरणीय करायला सत्राला प्रत्यक्ष उपस्थित राहून कालिदासप्रेमींमध्ये सामील व्हा.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Wednesday, July 5, 2023

सत्र २२९ : कथा साहसवीराची - फास्टर फेणे : शौनक पिंपुटकर

२९।०६।२०२३

सत्र २२९वे:

विषय : कथा साहसवीराची - फास्टर फेणे

सादरकर्ते : शौनक पिंपुटकर



नमस्कार !
तुम्हाला सर्वांना आजच्या आषाढी एकादशीनिमित्ताने शुभेच्छा !
कसं आहे, बदलत्या काळानुरुप जसे सिनेनायक-नायिका बदलतात तसेच त्या त्या काळातील, कथांमधील साहसवीर/नायकही. काल गोट्या-चिंगीची पुस्तके वाचणाऱ्या पिढीच्या नातवंडांना बोक्या-चिंटू-हॕरी पाॕटर हे किंडल नि इ-बुकवर वाचायला आवडू लागलेत.पण त्यांच्या पालकांना त्यांचा हिरो कोण होता विचारले तर ते निःसंशयपणे म्हणतील - *ट्टाॕक!* ... हां...! म्हणजे *फाफे म्हणजे फास्टर फेणे, म्हणजेच बन्या उर्फ बनेश फेणे !*

मराठी बाल-कुमारसाहित्यात व बाल-कुमारवाचकांत एक अढळपद प्राप्त केलेला नायक म्हणजे फा.फे.
पुस्तके , दूरदर्शन-मालिका, चित्रपट, किंडल, इ-बुक असा सगळा प्रवास केल्यानंतरही पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटत राहणारा फाफे.
फाफे म्हटल्यावर काय आठवतं ?
आठवते...
*फाफे म्हणजे तो चौकड्यांचा शर्ट, वाळकुड्या तंगड्या, कुठूनही कितीही उंचावरून उडी मारणे, भन्नाट वेगाने सायकलिंग, धावपळ हे व असल्या अनेकानेक बारीकसारीक गंमतीजमती ..शिवाय, संकटमालिका नि त्यावर युक्तीप्रयुक्तीने मात ...*

अश्या सगळ्या सगळ्या करामती वाचून बालवाचकांचे मन रमले नसते तरच नवल!
थोडक्यात, वाचकांच्या दृष्टीने बोलायचे तर, वाचनाच्या रस्त्यावरचे, मोक्याचे वळण म्हणजे *फास्टर फेणे!* जे एकदा मागे पडले तरी पुन्हा पुन्हा तिथे जावेसे वाटतेच वाटते..!

चला तर मग येताय ना ? आजच्या शब्दांगणच्या सत्राला. सादर करतोय आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांवर/विषयांवर सत्रे घेतलेला विविधांगी वाचनात रस असलेला *हॕरी पाॕटर- चिंटू- बोक्याच्या* जमान्यातही चक्क फाफे वाचणारा एक युवा वाचक- *शौनक पिंपुटकर.*

फास्टर फेणे हा ८० - ९० च्या दशकातल्या किशोरवयीन मुला- मुलींचा चा हिरो... नैतिक साहसाने आणि आदर्शवादाने भरलेला आणि भारलेला. शब्दांगणच्या आजच्या सत्राचं वैशिष्ट्य हे की ते मुलांबरोबर ऐकावं आणि नंतर त्यावर गप्पा ही माराव्या .... त्यानिमित्ताने तुमचं बालपण ज्या ज्या गोष्टींनी रंगवलं त्या त्या गोष्टींना उजाळा द्या. ते दिवस पुन्हा आठवण्यासाठी आजचं सत्र नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २२८ : Climate Change : सृष्टी गायकवाड,संजीवनी खापरे

२२।०६।२०२३

सत्र २२८वे:

विषय : Climate Change

सादरकर्त्या : सृष्टी गायकवाड, संजीवनी खापरे



गेले किमान २ आठवडे पाऊस आपल्याला हुलकावणी देतोय... आपण काय करणार? तर पहिली पावसाची सर आली की विसरून जाणार. अजून दोन महिन्यांनी सण येतील.... परत एक गट पर्यावरण पूरक सणांवर भर देणार आणि इतर लोक चर्चा करणार हिंदू धर्माच्याच सणांच्या चालीरीतींवर आक्षेप का? सण संपले की परत पुढल्या ट्रिगर पर्यंत आपण थांबू... काही काही प्रश्नांची व्याप्ती खुप मोठी आहे. पर्यावरणात होणारे बदल त्यातला एक अतिशय गंभीर प्रश्न. इतका - की त्यातून करोडो लोकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न गंभीर पणे उभा राहिलाय ... त्यांचे परिणाम सर्वव्यापी आणि दूरगामी आहेत. त्यावर केवळ आपणच नव्हे तर जग एकत्र येऊन प्रयत्न करतंय. आज या प्रश्नावर शब्दांगण चं सत्र घेतायेत ध्रुवच्याच दोन विद्यार्थिनी. *संजीवनी खापरे आणि सृष्टी गायकवाड* . अतिशय गांभीर्याने त्यांनी तयारी केली आहे. या प्रश्नांची जाणीव करून घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आजचं सत्र नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र २२७ : शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य : प्रशांत रावदेव

१५।०६।२०२३

सत्र २२७वे:

विषय : शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य

सादरकर्ते : प्रशांत रावदेव



शिवराज्याभिषेक ही जगाला प्रेरणादायी घटना. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या पार अफगाणिस्तान पासून ते आसाम पर्यंत आणि खाली दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या साम्राज्याच्या नाकावर टिच्चून, आदिलशाहीला न जुमानता महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ही साधीसुधी घटना नव्हती. संपूर्ण अरब प्रांताचे २०० वर्षात इस्लामीकरण झाले होते. भारत मात्र मुघलशाहीला पुरून उरला. आपलं स्वत्व हिंदूंनी महाराजांच्या रूपात टिकवून ठेवलं की उलट म्हणावं? महाराजांनी हिंदुत्व आणि स्वत्व टिकवून ठेवलं. अगर शिवाजी न होते, सुन्नत होती सबकी!
शिवराज्याभिषेक ही म्हणून एक प्रेरणादायी घटना...
अभक्तांचा क्षयो झाला .... आनंदवन भुवनी!

 *शिवराज्याभिषेकाला ३५०* वर्षे यंदा पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने *इतिहास संकलन समितीचे श्री. प्रशांत रावदेव* आजचं सत्र घेणार आहेत. नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, June 9, 2023

सत्र २२६ : ललित गजानन : चंद्रशेखर टिळक

०८।०६।२०२३

सत्र २२६वे:

पुस्तक : ललित गजानन

सादरकर्ते : चंद्रशेखर टिळक



दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन महाराजांची पोथी हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान! चांगल्या भक्तियोगाला रसाळ लेखनाची गेयतेची किंवा दृष्टांताची जोड असते! पण बऱ्याचदा साधक मात्र अध्यात्माला रसपूर्णतेचं वावडं असल्यासारखं निव्वळ श्रद्धा म्ह्णून वाचत राहतो. त्याच वेळेस एक अर्थतज्ञ हा रूढ अर्थाने कोरड्या पण सामाजिक जीवनाला आवश्यक अशा आर्थिक प्रश्नांची उकल गांभीर्याने करत असतो.

चन्द्रशेखर टिळक ही चौकट लीलया मोडतात. सिद्ध हस्त वक्ता असलेले टिळक वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके घेऊन आपल्यासमोर येत आहेत. गजानन ललित या पुस्तकावरचे सत्र म्हणूनच अनोखे!

विषय जिव्हाळ्याचा पण नाविन्यपूर्ण आणि त्याचवेळेस श्रद्धेय. वक्ता सिद्धहस्त! नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, June 2, 2023

सत्र २२५ : अरण्यवाचन : जतिन जोशी

०१।०६।२०२३

सत्र २२५वे:

विषय : अरण्यवाचन

सादरकर्ते : जतिन जोशी

द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सवी सत्र



मंडळी, शब्दांगणच्या मागच्या सत्रात निनाद भागवत यांनी आपल्याला भूशास्त्राचं बोट धरून पृथ्वीच्या अंतरंगाची आणि त्यामुळे पृष्ठभागावर होणार्‍या घडामोडींची रंजक आणि अद्भुत सफर घडवून आणली. शब्दांगणचं यावेळचं सत्र हे आपल्याला पृथ्वीवरील जंगलाच्या अद्भुत दुनियेची सैर घडवून आणणार आहे. सदाहरित, पानझडी जंगलं, खारफुटीची वनं असे अरण्यांचे प्रकार आपण शाळेत असताना अभ्यासलेले आहेत. पण या पुस्तकी संकल्पनांच्या पलीकडे जाऊन अरण्य म्हणजे काय? ते नक्की कसं बघावं, अरण्यवाचन म्हणजे नेमकं काय? अशा जंगलाच्या अपरिचित पैलूंचा परिचय या सत्रात आपल्याला होईल. आणि या विषयाचा परिचय करून देणार आहे आपल्या डोंबिवलीतीलच शालेय वयापासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करत असलेला युवा पर्यावरण आणि अरण्यप्रेमी जतिन जोशी. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भविष्यातील वाढत चाललेली निसर्ग -मानव साहचर्याची निकड, Human- Wildlife Conflictच्या वाढत्या घटना, जंगलांवरील मानवी अतिक्रमण या पार्श्वभूमीवर जतिनचं हे सत्र निश्चितच जंगलांविषयी वेगळा दृष्टिकोन निर्माण करणारं‌ ठरेल ज्यामधून आपल्या सर्वांनाच जंगलांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. त्यामुळे अरण्यवाचन या आगळ्यावेगळ्या विषयावरच्या रंजक सत्राला आवर्जून उपस्थित राहा.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Monday, May 29, 2023

सत्र २२४ : भूशास्त्रातील गमतीजमती : निनाद भागवत

२५।०५।२०२३

सत्र २२४वे:

विषय : भूशास्त्रातील गमतीजमती

सादरकर्ते : निनाद भागवत



उन्हाळ्याच्या काहिलीत शेकल्यावर पावसाच्या ४ थेंबांचेही अप्रूप वाटते. मग हा जो कोसळतो तो जीव नकोसा करतो. कधी अति ऊन, तर कधी अति धंडी! हे सगळे त्या अल् निनोमुळे! असे कुठेतरी वाचनात येते. खरे तर हे बदलते उष्णतामान, पर्जन्यमान पृथ्वीशी संलग्न आहेत. म्हणजेच पृथ्वीचे / भूपृष्ठाचे तापमान. या
भूपृष्ठाचा अभ्यास, म्हणजेच भूशास्त्र ! या शास्त्राशी आपला संबंध फक्त मातीचे प्रकार, कुठे कुठली माती असते? कुठल्या पिकाला कोणती माती ? कुठल्या मातीत कुठली खनिजे मिळू शकतात? इतकाच आलेला असतो. किंवा फार फार तर
एखाद्या प्राचीन संस्कृतीविषयी संशोधन करण्याकरता कुठे उत्खनन करावे लागेल ? कुठून व कसा लाव्हा फुटतो? यासारख्या काही बाबी जेव्हा आपल्या समोर फुटतात. तेव्हा शाळेत कधीतरी आलेला असतो. अन्यथा, प्रत्यक्ष जीवनात, केदारनाथचे भूस्खलन, हिमालयात गिर्यारोहकांची हिमस्खलनामुळे होणारी कोंडी, माळीण गावाचे गाडले जाणे किंवा भूकंप अशा बातम्या वाचून त्याविषयी आपण सजग होतो. तेव्हा मग आपल्याला पुन्हा ते सगळे विस्मृतीत गेलेले मुद्दे म्हणजे, जमिनीचा प्रकार, बर्फाच्या थराची जाडी, Deccan plateau वगैरे शब्द आठवतात.
हे घडाभर प्रास्तविक करण्याचे कारण,
शाळेतून एकदा व एकदाचा या विषयाला टाटा-बाय-बाय म्हटल्यानंतर पुन्हा या विषयाच्या वाटेला कोणी एक जण जातो. नव्हे त्यावर संशोधन करतो. इतकेच नाही तर त्यावर शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करणाऱ्या मंडळीत आपली शोधपत्रिका मांडतो. तो विषय घेऊन आपल्या पुढील आयुष्याचा मार्ग आखतो. त्याला आपले करियर मानतो. हे खूपच आगळे आहे. ह्या अशा विषयाचे विविध पैलू अत्यंत गंभीरपणे अभ्यासणारा निनाद भागवत आपल्या डोंबिवलीचाच असावा. हाही एक दुर्मिळ योगच!
खरे म्हणजे, मातीच्या अभ्यासात केवळ काळी, मुरुम, लाल इतकेच प्रकार नाहीत. तर चंद्र, मंगळ याही ग्रहांवरच्या मातीचे पृथःकरण करावे लागते. हे भूशास्त्र म्हणजे भूपृष्ठाचा अभ्यास, पृथ्वीचे वय, तिचे अंतरंग, तिचे तापमान, त्यामुळे बदलणारे ऋतुमान, पर्जन्यमान, भूजल, नद्यांची पातळी, यापासून ते डोंगर, टेकड्या, मातीचे प्रकार, अगदी पार ग्रहगोलांवरील भूरचनांच्या अभ्यासापर्यंत याची व्याप्ती आहे. अशा सकळ पृथ्वीला आंदोळून ते पार खगोलापर्यंत पोचणारी ही शास्त्रशाखा. या बहुपेडी शास्त्राच्या कवेत काय काय म्हणून येते हे कळायलाही आपल्याला थोडा वेळ लागेल. सहजगत्या आवाक्यात न येणाऱ्या ह्या एकदम वेगळ्या अवघड वाटेवरती अध्ययन करून, संशोधन करून *'अभ्यासोनि प्रकटावे'* तसा हा तरुण डोंबिवलीकर संशोधक म्हणजे निनाद भागवत ह्या विषयाची माहिती आपल्यापुढे मनोरंजक पध्दतीने
सादर करणार आहे. तेही दृक्-श्राव्य सादरीकरणाच्या स्वरुपात.

भारतात अभियांत्रिकी शिक्षण त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण -->नोकरी ह्या सध्याच्या ठरीव चाकोरीपेक्षा हटके अभ्यास-विषय निवडणारा अमेरिकेत Ph.D. करत असलेला हा pathbreaker म्हणावा असा तरुण लेखक !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २२३ : तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण : आशुतोष टिळक

१८।०५।२०२३

सत्र २२३वे:

विषय : तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण

सादरकर्ते : आशुतोष टिळक



तेलाच्या किमती हा अत्यंत ज्वालाग्राही प्रश्न. केवळ आजच नव्हे तर गेली ५-६ दशकं आंतरराष्ट्रीय राजकारण त्याभोवती फिरतंय. मध्य पूर्व प्रदेशात युरोपीय आणि अमेरिकेचा हस्तक्षेप वाढला तो मुळी याच मुळे. आंतर राष्ट्रीय बाजारात एक डॉलर प्रति बॅरल ने भाव वाढले तर भारतावर त्याचा ७ ते ८ हजार कोटींचा दबाव वाढतो. या आकडेवारीतूनच तेलांच्या किमतीचे गांभीर्य लक्षात यावे. आजच्या शब्दांगण च्या सत्रात तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय घेऊन बोलणार आहेत जळगावचे *आशुतोष टिळक.*
शब्दांगणच्या आजच्या सत्राचे वक्ते, आशुतोष टिळक आपल्या passionate पण सखोल मांडणीसाठी ओळखले जातात. अर्थविषयक ब्लॉग चालवणाऱ्यांची संख्या तशी कमीच. त्यातही एखादा तरुण लेखक स्वतःहून अर्थविषयक ब्लॉग लिहू इच्छितो हे ही तसे अप्रूपच. विषय ज्वलंत आहे आणि आवश्यक सुद्धा.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २२२ : जम्मू-काश्मीर मधील स्त्री-जीवन : सौ. नंदिनी पित्रे

११।०५।२०२३

सत्र २२२वे:

विषय : जम्मू-काश्मीर मधील स्त्री-जीवन

सादरकर्त्या : सौ. नंदिनी पित्रे (हम ट्रस्टच्या कार्यकर्त्या )



शतकानुशतकं अनेक भाषा, अनेकविध कला, विविध संस्कृती इत्यांदींचं माहेरघर असलेलं, खुद्द आदि शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पृथ्वीवरचा स्वर्ग पासून ते शापित नंदनवन म्हणवलं जाण्याचा प्रवास करणारं आपलं धगधगतं काश्मीर !! एकेकाळी प्रगतीच्या आणि समृद्धीच्या यशोशिखरावर असलेल्या या पवित्र आणि समृद्ध भूभागाकडे सुमारे हजार वर्षांपूर्वी सर्वप्रथम इस्लामची विखारी नजर वळली आणि त्यानंतर ती यशोभुमी इस्लामी आक्रमणं, अत्याचार, बलात्कार, सामूहिक कत्तली अशा सततच्या विनाशाच्या वरवंट्याने भयकंपित होत राहिली.

अशा या काश्मीरच्या रमणीय पण तितक्याच दाहक प्रदेशात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काही वर्षांपूर्वी 'हम ट्रस्ट' या संस्थेने जमिनीवर उतरून कामाला सुरुवात केली. या कामादरम्यान आलेले विविध अनुभव आणि त्यातून काश्मीरमधल्या स्त्रीजीवनाविषयी सामोरी आलेली काही सत्यं, वस्तुस्थिती, डेटा यांचं सादरीकरण हा आपल्या आजच्या शब्दांगणच्या सत्राचा विषय आहे . हम ट्रस्ट तर्फे या कामात हिरीरीने सहभागी असलेल्या सौ नंदिनी पित्रे या त्यांना स्वतःला काश्मीरमध्ये काम करत असताना आलेले तिथल्या स्त्रीजीवनाबद्दलचे अनुभव आपल्यासमोर मांडणार आहेत.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २२१ : छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य - नरहर कुरुंदकर : शशांक लखोटे

०४।०५।२०२३

सत्र २२१वे:

पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य

लेखक : नरहर कुरुंदकर

सादरकर्ते : शशांक लखोटे



महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा सम्यक आढावा घेण्याचे प्रयत्न अनेक लेखक, साहित्यकार, विचारवंतांनी केले आहेत. त्यात वेगवेगळ्या आणि प्रसंगी परस्परांहून सर्वस्वी भिन्न अशा विचारधारा असलेल्या लोकांचा समावेश आहे. कोणाला महाराज हिंदू धर्मभिमानी वाटतात तर कोणी महाराजांना सर्वधर्मसमभावाचं पालन करणारे म्हणून रंगवतं. कोणी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतं तर कोणी कुळवाडीभूषण !! अलीकडे तर महाराजांचा मूळ इतिहास बदलण्याचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना निव्वळ विशिष्ट जातीपायी बेदखल केलं गेल्याचं घृणास्पद राजकारण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्याला महत्त्वाचे राजकारणी नेते आणि सरकारकडून उघड उघड पाठींबा मिळाल्याचंही !!

शिवाजीमहाराजांचं वादळी आयुष्य हे कुठल्याही काळात कालबाह्य होऊ शकत नाही हेच खरं! शिवाजी महाराज नक्की कसे होते हे जाणून घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. जागर, शिवरात्र, आकलन, मनुस्मृती सारखं विचारप्रवर्तक लेखन करणारे पुरोगामी विचारांचे अर्ध्वयू असणारे नरहर कुरुंदकरही त्याला अपवाद ठरले तरच नवल. अर्थातच रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या ग्रंथाला कुरुंदकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा माध्यमातून त्यांचा या विषयावरच्या व्यासंगाचा अनुभव आपण घेतलेला आहेच. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' या छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांचं जीवनचरित्र जाणून घेताना त्यांनी महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटना, त्यांचे परिणाम यांची संगती लावून काही महत्त्वाचे निष्कर्षही मांडले आहेत.

अशा महत्त्वाच्या विषयावरील पुस्तकाविषयी विचार मांडताना वक्ताही तितक्याच तोलामोलाचा असल्यावर सत्र अधिकच रंगतं हा आपला आजवरचा शब्दांगण चा अनुभव आहे. आजचं सत्र हे नक्कीच अशा रंगतदार सत्रांपैकी एक असणार आहे कारण सत्र घेणार आहे शशांक लखोटे. शशांकचा सर्वच विषयांप्रमाणे कुरुंदकरांच्या साहित्याचाही खूप चांगला अभ्यास आहे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २२० : डिजिटल मीडिया - करिअर घडवणारं टूल : ओंकार दाभाडकर

२७।०४।२०२३

सत्र २२०वे:

विषय : डिजिटल मीडिया : करिअर घडवणारं टूल

सादरकर्ते : ओंकार दाभाडकर



आयटी क्षेत्रातील उत्क्रांतीमुळे नव्वदीच्या दशकात मल्टिमीडिया हा शब्द उदयास आला. त्यानंतरच्या जेमतेम पाव शतकभरातच मल्टिमीडिया ते डिजिटल मीडिया हा प्रवास आपण अत्यंत वेगाने होताना बघितला. या प्रवासात अनेक टप्प्यांवर लागलेल्या अनेकानेक छोट्या मोठ्या शोधांमुळे मानवी जीवन अधिकाधिक सुखकर झाल्याचं आपण अनुभवलं. पण त्या जोडीलाच या शोधांमुळे जन्माला आलेले सायबर क्राईम, हॅकिंग सारखे दुष्परिणामही आपण बघितले. डिजिटल किंवा सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे अशा प्रकारचं वाक्य कदाचित त्यामुळेच जन्माला आलं असावं.

डिजिटल मीडिया चा उपयोग वाचन करणे, व्हिडीओ बघणे, जोक्स वाचणे, रिल्स बघणे, राजकारणाशी संबंधित समूहांबर आपापल्या दादा, साहेब, दाजींच्या नावाने वितंडवाद घालणे एवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग आपलं करिअर घडवण्यासाठीही करता येऊ शकतो याची जाणीव काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींना फार लवकर झाली.

अशा काही निवडक व्यक्तींपैकी एक जण म्हणजे *ओंकार दाभाडकर* . ओंकार दाभाडकर आज शब्दांगणच्या सत्रात त्यांचे डिजिटल मीडिया विषयीचे अनुभव, त्यांचा प्रवास, त्यांचं व्हिजन आपल्यासमोर मांडणार आहेत. आवर्जून अनुभव घ्यावा असं हे सत्र! नक्की ऐका!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २१९ : ChatGPT : केदार मराठे

२०।०४।२०२३

सत्र २१९वे:

विषय : ChatGPT

सादरकर्ते : केदार मराठे



AI अर्थात आर्टिफिशिअल इंटलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) इत्यादी शब्दप्रयोग गेल्या काही वर्षांत आपल्या परिचयाचे झाले आहेत. या शब्दांची ओळख होऊन ते स्थिरावत असतानाच काही महिन्यांपूर्वी एक सातअक्षरी वादळ अचानक घोंघावत आलं आणि त्याने येत्या काही वर्षांत आपण सगळी क्षेत्रं कशी लीलया काबीज करू शकतो याची चुणूक दाखवायला प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे याचे फायदे तोटे गणले गेले, उपयुक्ततेचा विचार केला गेला, भविष्यात अजून किती प्रगती होईल याचे आडाखे मांडले गेले. पण अर्थात या क्षेत्राबद्दल आपल्याला निदान अजून तरी खूप तुटपुंजी माहिती आहे किंवा त्याच्या क्षमतेचा कदाचित पूर्ण अंदाज आपल्याला यायचा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपण कशाबद्दल बोलतोय हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आलं असेलच. तर त्या सातअक्षरी वादळाचं नाव आहे ChatGPT. आपलं या आठवड्याचं शब्दांगण सत्र याच विषयावर आहे. आणि सत्र घेणार आहेत केदार मराठे.

केदारने गेल्या वर्षी Life 3.0 या पुस्तकावर आणि तद्नुषंगाने आर्टिफिशिअल इंटलिजन्स या विषयावर घेतलेलं सत्र अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण झालं होतं हे आपल्या स्मरणात असेलच. अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगण्याची विशेष हातोटी असलेल्या केदारचं ChatGPT वरचं सत्रही तितकंच अप्रतिम होईल याची खात्री आहेच. तर ChatGPT या नवीन स्फोटक, रंजक विषयाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असलेल्यांनी या सत्रासाठी आवर्जून उपस्थित राहायला हवं. नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...