Monday, March 13, 2023

सत्र २१३ : आत्मभान : प्राजक्ता देवधर

 ०९।०३।२०२३

सत्र २१३वे:

विषय : आत्मभान

सादरकर्त्या : प्राजक्ता देवधर



मंडळी आजचं सत्र अगदी खास! कालच आपण सर्वांनी जागतिक महिला दिन साजरा केला. महिलांच्या सक्षमीकरणाची, स्वावलंबनाची चर्चा करताना आर्थिक मुद्दा अतिशय महत्वाचा. परंतु त्याचा विचार तिने कमावणे या पलीकडे बऱ्याचदा जात नाही. खर्च, आर्थिक नियोजन , गुंतवणूक आणि त्यातून तिचं निर्णय प्रक्रियेत बळकट होत जाणारं स्थान ही सक्षमीकरणाची महत्वाची वाट! आजचं शब्दांगणचं सत्र ' आत्मभान ' हे या विषयाची मांडणी करणारं आहे. सादर करणार आहेत पेंढारकर कॉलेज मधील निवृत्त प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता देवधर मॅडम. ३५ वर्षे विद्याथ्यांना जवळून बघणाऱ्या मॅडमनी त्यासोबत विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यही केले आहे, करत आहेत. त्यांच्या अनुभवातून दृष्टीस पडलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा या वाटेचा धांडोळा ऐकण्यासाठी नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २१२ : काव्यमैफिल : आपण सर्व

०२।०३।२०२३

सत्र २१२वे:

विषय : काव्यमैफिल

सादरकर्ते : आपण सर्व



आजचं शब्दांगण: मुक्त काव्य मैफिलीचं... प्रत्यक्ष आलात तर अधिक आनंद लुटता येईल. तुम्ही तुम्हाला भावलेली एक कविता घेऊन या. सादर करा... तुमच्याकडे नसेल तर इथे काही पुस्तके आहेत. .... आज स्वतःच्या आनंदासाठी निदान एक कविता वाचूया.... आणि इतरांनी वाचलेल्या ऐकू या ....


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २११ : छत्रपतींचे आरमार आणि आधुनिक भारतीय नौसेना : संजीवनी खापरे आणि आदिती पारेकर

२३।०२।२०२३

सत्र २११वे:

विषय : छत्रपतींचे आरमार आणि आधुनिक भारतीय नौसेना

सादरकर्त्या : संजीवनी खापरे आणि आदिती पारेकर



आजचं शब्दांगण मूळ उद्देशाला साजेसं. ध्रुव च्या दोन विद्यार्थिनी *आदिती पारेकर* आणि *संजीवनी खापरे* घेतायत. विषय अर्थातच लक्ष्यवेधक - *छत्रपतींचे आरमार आणि आधुनिक भारतीय नौसेना* . भविष्य घडवण्यासाठी इतिहासाचे स्मरण आवश्यक. भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. आज भारतीय नौसेनेचे सामर्थ्य जगात ओळखले जाते. हिंदी महासागरात एका अर्थाने आपली दादागिरी चालते. आजच्या सत्राच्या निमित्ताने यांचा धांडोळा घेऊयात.
आदिती आणि संजीवनी ध्रुव मध्ये आपल्या अभ्यासाकरिता आणि विविध उपक्रमांमधल्या सहभागाकरता ओळखल्या जातात. आज प्रथमच शब्दांगण मध्ये सत्र घेतायत. त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २१० : विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस : दिलीप महाजन (प्रकट मुलाखत) : मुलाखतकार : माधव जोशी

१६।०२।२०२३

सत्र २१०वे:

विषय : विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस

सादरकर्ते : दिलीप महाजन (प्रकट मुलाखत)

मुलाखतकार : माधव जोशी



मंडळी आजचं शब्दांगण सत्र हे समर्पितांचं.... बोरकरांनी म्हटलंय
 *देखणी जी पाऊले जी ध्यासपंथे चालती*
 *वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती* ...
वैचारिक साहित्य प्रकाशित करण्याचा वसा घेतलेले *मोरया प्रकाशनाचे दिलीप राव महाजन* ! विवेकानंद केंद्राचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सपत्नीक काम करतानाच्या मंतरलेल्या दिवसांवर, एकनाथजींच्या सहवासामुळे उजळून निघालेल्या त्यांच्या जीवनावर, कामाच्या निमित्ताने भेटलेल्या भेट घेतलेल्या विविध मान्यवरांच्या अनुभवाचं कथन आज शब्दांगण मध्ये मुलाखतीच्या निमित्ताने होतंय ...
मघाचच्या कवितेच्या ओळी वापरून सांगायचं झालं तर
 *देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके*
 *चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे* !

अशा समृद्ध तृप्त आयुष्याचे दृश्य स्वरूप ज्यांच्याकडे पाहून जाणवते ते *माधवराव जोशी* आज ही *मुलाखत* घेतायत!  

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २०९ : जगन्नाथ शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार : महेश वझे

०९।०२।२०२३

सत्र २०९वे:

विषय : जगन्नाथ शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार

सादरकर्ते : महेश वझे

आजचं शब्दांगण वेगळं. विषय जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट . *मुंबईचे शिल्पकार* म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. पुलंच्या भाषेत सामान्य मुंबईकर साहेबाच्या उल्लेखाने गहिवरतो. याचं मुख्य कारण म्हणजे *जगन्नाथ शंकरशेट* यांच्यासारखी माणसं. त्यांनी मुंबईला घडवण्यात महत्वाचा वाटा उचलला. इथल्या नागरीकरणाला दिशा दिली. त्यांनी मुंबईच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळींचा आणि लोककल्याणकारी सुधारणांचा पाया रचला. आज त्यांच्या चरित्रातून त्यांचे दर्शन तर घडेलंच पण तत्कालीन मुंबईचे दर्शन सुद्धा घडेल. आपल्या दिलखुलास अभिप्रायासाठी, संवेदनशील मृदू व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे *महेश वझे* आजचं सत्र घेतायंत. ऐकायला नक्की या.


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !




सत्र २०८ : भारतीय अर्थव्यवस्था : डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि भविष्यकाळ : श्रीराम कुंटे

०२।०२।२०२३

सत्र २०८वे:

विषय : भारतीय अर्थव्यवस्था : डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि भविष्यकाळ

सादरकर्ते : श्रीराम कुंटे



कालच आपलं बजेट संसदेत मांडलं गेलं, त्याचे अर्थ आणि अनर्थ आपण चर्चांमध्ये ऐकत असालच. आजचं सत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेविषयी. बहुचर्चित डिमॉनेटायझेशन पासून आत्ता परवाच्या आपल्याला मिळालेल्या G -२० च्या अध्यक्षपदाबाबत. अर्थव्यवस्थेतल्या आपल्या सामर्थ्यांचा आणि कच्च्या दुव्यांचा घेतला जाणारा मागोवा. अर्थशास्त्र आणि राजकारण सोबत जातं. Good economics is not good politics असं म्हटलं जातं. आपली प्रामुख्याने अर्थशास्त्राची चर्चा ही सुद्धा राजकारणाच्या अंगानेच झडत जाते. त्यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा हा आज वेध घेतला जाईल.
श्रीराम कुंटे शब्दांगण मधल्या त्यांच्या मागच्या दोन अभ्यासपूर्ण सत्रांमध्ये आपल्याला परिचयाचे असतीलच.. नर्म विनोदी तरीही काही वेळा अंतर्मुख करणारं त्यांचं वक्तृत्व, आणि काहीवेळा आरसा दाखवणाऱ्या तथ्यांची मांडणी आणि त्यातून विवेकाला केलेले आवाहन, *श्रीराम कुंटे* उत्तम संवादक आहेत. त्यांच्या सत्राचा अनुभव घेण्यासाठी नक्की या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २०७ : राष्ट्रनिर्माते विवेकानंद : प्रा. नरेंद्र जोशी

२६।०१।२०२३

सत्र २०७वे:

विषय : राष्ट्रनिर्माते विवेकानंद

सादरकर्ते : प्रा. नरेंद्र जोशी



मंडळी, आजचं शब्दांगण अतिशय खास! आजचे शीर्षक पाहीले तर काहींच्या भुवया उंचावतील. विवेकानंद कितीही आदरणीय असले तरी राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांचा उल्लेख करावा का ? हा प्रश्न काहींना पडला असेल. ५००० वर्षांच्या तरुण भारताचे निर्माते विवेकानंद कसे? त्या पंडिती अर्थाने हा शब्द प्रयोग नाही. आधुनिक भारताची संकल्पना विवेकानंदांच्या कार्यातून स्पष्ट होते. भारत स्वतःला विवेकानंदांच्या माध्यमातून शोधत गेला.
आधुनिक भारताचं भारतीयत्व आपल्याला सापडत गेलें. आधुनिक काळात भारताला 'नेशन इन मेकिंग' अशी संज्ञा दिली गेली. सांस्कृतिक दृष्ट्या भारत हजारो वर्षे अस्तित्वात असला तरी राजकीय दृष्ट्या आजचा भारत १९४७ साली अस्तित्वात आला. राष्ट्र आणि नेशन यात फरक आहे अशी मांडणी अनेकांनी केली. पण विवेकानंदांच्या विचारांमध्ये भारताचा इतिहास, भूगोल, धर्म आणि संस्कृती हे अविभाज्य घटक आहेत. या भूमीतच हा धर्म, आणि ही संस्कृती उदयाला येऊ शकली. आणि ती जर टिकायला हवी असेल तर आमचा भूगोल - म्हणजेच आमची भूमीसुद्धा टिकायला हवी आणि इतिहासाचं योग्य आकलन सुद्धा असायला हवं. त्याचं परिशीलन सुद्धा व्हायला हवं.

अपने अतीत को पढकर
अपना इतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करे राष्ट्र का चिंतन !
हाच आजच्या सत्राचा उद्देश.

आजचा वक्ता हा ज्ञानवंत आणि कर्मसिद्ध दोन्ही आहे. प्रा. डॉ. *नरेंद्र जोशीं* मध्ये, विवेकानंद केंद्राच्या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानातली आणि आचरणातली शीतलता - त्यांच्या मृदू व्यक्तिमत्वात भरून राहीली आहे. आजच्या विषयाचा आणि वक्त्याचा असा अनुभव घेण्यासाठी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...