०४।०५।२०२३
सत्र २२१वे:
पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य
लेखक : नरहर कुरुंदकर
सादरकर्ते : शशांक लखोटे
महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा सम्यक आढावा घेण्याचे प्रयत्न अनेक लेखक, साहित्यकार, विचारवंतांनी केले आहेत. त्यात वेगवेगळ्या आणि प्रसंगी परस्परांहून सर्वस्वी भिन्न अशा विचारधारा असलेल्या लोकांचा समावेश आहे. कोणाला महाराज हिंदू धर्मभिमानी वाटतात तर कोणी महाराजांना सर्वधर्मसमभावाचं पालन करणारे म्हणून रंगवतं. कोणी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतं तर कोणी कुळवाडीभूषण !! अलीकडे तर महाराजांचा मूळ इतिहास बदलण्याचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना निव्वळ विशिष्ट जातीपायी बेदखल केलं गेल्याचं घृणास्पद राजकारण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्याला महत्त्वाचे राजकारणी नेते आणि सरकारकडून उघड उघड पाठींबा मिळाल्याचंही !!
शिवाजीमहाराजांचं वादळी आयुष्य हे कुठल्याही काळात कालबाह्य होऊ शकत नाही हेच खरं! शिवाजी महाराज नक्की कसे होते हे जाणून घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. जागर, शिवरात्र, आकलन, मनुस्मृती सारखं विचारप्रवर्तक लेखन करणारे पुरोगामी विचारांचे अर्ध्वयू असणारे नरहर कुरुंदकरही त्याला अपवाद ठरले तरच नवल. अर्थातच रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या ग्रंथाला कुरुंदकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा माध्यमातून त्यांचा या विषयावरच्या व्यासंगाचा अनुभव आपण घेतलेला आहेच. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' या छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांचं जीवनचरित्र जाणून घेताना त्यांनी महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटना, त्यांचे परिणाम यांची संगती लावून काही महत्त्वाचे निष्कर्षही मांडले आहेत.
अशा महत्त्वाच्या विषयावरील पुस्तकाविषयी विचार मांडताना वक्ताही तितक्याच तोलामोलाचा असल्यावर सत्र अधिकच रंगतं हा आपला आजवरचा शब्दांगण चा अनुभव आहे. आजचं सत्र हे नक्कीच अशा रंगतदार सत्रांपैकी एक असणार आहे कारण सत्र घेणार आहे शशांक लखोटे. शशांकचा सर्वच विषयांप्रमाणे कुरुंदकरांच्या साहित्याचाही खूप चांगला अभ्यास आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment