०९।०६।२०२४ - राष्ट्रीय सौर १९ ज्येष्ठ १९४६
सत्र २५८वे:
विषय : प्रतिभापुरुषोत्तम
सादरकर्ते : श्री. शौनक पिंपुटकर
ग्रीक पुराण कथांमध्ये मिडास राजाची गोष्ट सांगितली जाते. तो ज्या गोष्टीला हात लावेल त्याचे सोने होईल असा वर या राजाला मिळालेला असतो. मला वाटतं, खऱ्या आयुष्यातही अशा सुवर्णस्पर्शी प्रतिभेचं वरदान काही व्यक्तिमत्त्वांना लाभलेलं असावं किंबहुना आपल्या परिश्रमांनी आणि साधनेने त्यांनी ते प्राप्त करून घेतलं असावं, म्हणूनच अशा व्यक्तींनी स्पर्श केलेल्या सर्वच क्षेत्रांचे जणू सोने होते ! अष्टपैलू हा शब्दही उणा ठरावा, अशी बावनकशी प्रतिभा लाभलेलं असंच एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे ! पु. लं बद्दल लिहिताना कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणूनच म्हणतात,
पुलस्पर्श होताच दुःखे पळाली
नवा सूर आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्य गंगेत न्हाली
पुलंस्पर्शाची ही संजीवनी आजही कायम आहे. या महिन्यात १२ जून रोजी पुलंचा स्मृतिदिन !या निमित्ताने पुलं स्मरणाच्या आनंद यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ९ जून, रविवार रोजी पुढचं सत्र प्रतिभापुरुषोत्तम अर्थात पु. लंच्या बहु आयामी प्रतिभेचे दर्शन घडवणारे असणार आहे. खरंतर त्यांनी केलेलं विनोदी लेखन असो वा वैचारिक लेखन, संगीत दिग्दर्शन असो वा नाट्यनिर्मिती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकाच वेळी विद्वत्ता, रसिकता आणि कल्पकतेचा संगम झाला होता. बरं हे गुणही 'चंद्रमे जे अलांछनु' असेच ! कारण त्यांच्या विद्वत्तेला बोजडपणाचा शाप नव्हता, विनोदी लेखनातूनही सहज प्रकट होणारी, अवडंबर न माजवणारी अशी त्यांची शालीन विद्वत्ता ! रसिकताही कशी, तर खाण्यापासून ते गाण्यापर्यंत आणि सामान्य माणसापासून ते असामान्य व्यक्तींपर्यंत साऱ्यांमधलेच गुणावगुण अचूक हेरणारी ! आणि कल्पकताही नवोन्मेषशालिनी असूनही सत्याच्या पायावरच भराऱ्या घेणारी ! खरंतर हे सारे पैलू म्हणजे एकेका स्वतंत्र सत्राचे विषयच परंतु एकाच सत्रात यातील अनेक पैलूंना स्पर्श करून पुलंच्या समग्र साहित्याचं चित्र मांडायचं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. पण हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे शब्दांगण कुटुंबातील एक पुलप्रेमी सदस्य शौनक पिंपुटकर !
शौनकने याआधीही मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास, एक शून्य मी अशा पु. लंच्या पुस्तकांवर आणि इतरही विषयांवर सत्रे घेतली आहेत. आणि आता महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांच्या समग्र साहित्याविषयी आणि जीवनाविषयी तो काय दृष्टिकोन मांडतो याची उत्सुकता आहे.
पु. ल आपल्या खाद्यजीवन या लेखामध्ये म्हणतात, चिवड्याची चव ही खाणाऱ्यांच्या संख्येने गुणल्यावर वाढते. या सत्राची रंगत सुद्धा उपस्थित श्रोत्यांच्या संख्येने गुणल्यावर वाढेल. तेव्हा ९ जून ची संध्याकाळ पुलकित करण्यासाठी भेटूया संध्याकाळी ५.३० वाजता !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment