Sunday, September 1, 2024

सत्र २५३ : मला उमगलेले भैरप्पा : श्री. गणेश मनोहर कुलकर्णी

२३।०३।२०२४ - राष्ट्रीय सौर ३ चैत्र १९४६

सत्र २५३वे: 

विषय : मला उमगलेले भैरप्पा

सादरकर्ते : श्री. गणेश मनोहर कुलकर्णी

     काही साहित्यकृतींमध्ये भाषेची कुंपणं ओलांडून अवघ्या मानवी मनाला भुरळ घालण्याची, जागं करण्याची आणि विचार प्रवृत्त करण्याची क्षमता असते, अशाच काही साहित्यकृतींचे जनक म्हणजे कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ! वैदिक तत्त्वज्ञानावर पोसलेल्या या भारतभूमीमध्ये ऋषींना फार आदराचं स्थान आहे. बाह्य रुपापेक्षा आंतरिक सत्याचा शोध जास्त महत्त्वाचा मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत ऋषीचे वर्णनही म्हणूनच केवळ त्याने वाढविलेल्या दाढीवर अवलंबून नाही. ऋषय: सत्य वचस: अर्थात् सत्याचे दर्शन घेणारे आणि घडवणारे ते ऋषी असे आपली संस्कृती म्हणते. एस. एल भैरप्पा हे म्हणूनच आधुनिक भारतातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ! असत्याचे आवरण दूर करून सत्याचे सार्थ दर्शन घडवणारे असे साहित्यिक म्हणजे एस एल भैरप्पा ! सध्या समाजमाध्यमांपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वत्रच  सत्याच्या नावाखाली तथ्याचे एकांगी दर्शन घडत असतं अशा वेळी भैरप्पा कादंबरी या म्हटलं तर काल्पनिक लेखन माध्यमासाठी सुद्धा वर्षानुवर्ष अभ्यास करतात, भारतातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देतात आणि त्यानंतरच्या चिंतनातून त्यांना गवसलेलं सत्य अतिशय निर्भीडपणे मांडतात हे खरोखर वैशिष्टयपूर्ण आहे ! ते धर्मश्री , वंशवृक्ष यासारख्या कादंबऱ्यांमधून कधी तत्त्वज्ञानाचा विचार मांडतात, उत्तरकांड सारख्या कादंबरीत उत्तर रामायणाचे तर पर्व मधून महाभारताचे एक वेगळेच दर्शन घडवतात तर कधी मंद्र सारख्या कादंबरीमध्ये एकाच व्यक्तिमत्त्वामधील, दिवसेंदिवस उन्नतीचे सोपान चढणारा कलाकार आणि त्याबरोबरीने अवनतीच्या गर्तेत पडणारा माणूस असा विरोध दाखवून विषण्ण करतात. खरंतर भैरप्पांच्या कथांमध्ये तत्त्वज्ञान, इतिहास, काव्य, संगीत असे वेगवेगळे कप्पे उरतच नाहीत त्यांची अलवार पण भक्कम अशी वीणच ते विणत जातात. अशीच ही अनेक रंगांनी, अनेक धाग्यांनी गुंफलेली वीण उलगडून सांगणारं शब्दांगणचे पुढचे सत्र... मला उमगलेले भैरप्पा ! विविधांगी वाचन आणि विपुल लेखन करणारे, रुळानुबंध या पुस्तकाचे लेखक श्री. गणेश कुलकर्णी हे सत्र घेणार आहेत. एस. एल भैरप्पा यांचे लेखन मराठी माणसापर्यंत पोचवण्याचं श्रेय जातं त्या अनुवादिका अर्थात् उमा कुलकर्णी!  गणेशजींनी उमा ताईंच्या घेतलेल्या मुलाखतीचे आपल्यापैकी अनेक डोंबिवलीकर साक्षी असाल. येत्या सत्रात ते आपल्याला भैरप्पांच्या साहित्य विश्वाची सफर घडवणार आहेत. तेव्हा दिनांक २३ मार्च २०२४ रोजी भैरप्पांच्या साहित्य विश्वात डोकवून बघण्यासाठी नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...