१०।०३।२०२४ - राष्ट्रीय सौर २० फाल्गुन १९४५
सत्र २५२वे: (डोंबिवलीकर कल्चर क्लबच्या सहयोगाने)
विषय : माझा टाटा विश्वातील प्रवास
सादरकर्ते : श्री. माधव जोशी
भारतीय उद्योगजगतातील एक अग्रगण्य आणि आदरणीय उद्योग समूह म्हणजे टाटा उद्योग समूह ! कै. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये स्थापन केलेल्या या उद्योगाने अव्याहत प्रगतीचे सोपान चढत अवघं भारतीय उद्योग विश्व व्यापून टाकलं आहे; इतकंच काय जगभरात भारतीय उद्योगाची मान उंचावण्यामध्ये टाटा समूहाचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.
पण टाटा समूहाचं यश केवळ संपत्ती किंवा शेअर बाजारातील स्थाना पुरते मर्यादित नाही तर त्यापलीकडे जाऊन या कंपनीने समाजाभिमुखता जपत लोकांच्या मनामध्ये विश्वासाचे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे. आणि म्हणूनच टाटा समूहाच्या या उत्कर्षाचे सूत्र नेमके काय आहे, केवळ बाजारमूल्याला किंमत असलेल्या कॉर्पोरेट जगात टाटा समूहाने वर्षानुवर्षे नीतीमूल्यांची जोपासना कशी केली असेल याबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्याच मनात असते.
पिढ्यानपिढ्यांचा हा विश्वास कमावणाऱ्या या टाटा नामक मॉडेलच्या यशाचे गमक नेमके काय हे उलगडून सांगणारं, एक नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे डोंबिवलीकर श्री. माधव जोशी लिखित टाटा : एक विश्वास ! खरंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा अनेक वर्षांचा दांडगा आणि विविधांगी अनुभव असलेल्या माधवजींना आपण डोंबिवलीकर ओळखतोच. २०२२ मध्ये प्रकाशित झालेलं माझी कॉर्पोरेट दिंडी हे त्यांचं आत्मचरित्रसुद्धा आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. टाटा समूहामध्ये २२ वर्षांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळताना माधवजींनी खुद्द रतन टाटांबरोबरही जवळून काम केले आहे. शब्दांगणच्या येत्या २५२ व्या सत्रात श्री. माधव जोशी स्वतः आपल्या पुस्तकाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. तसंच या सत्रामध्ये टाटा एक विश्वास या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन ही होणार आहे.
तेव्हा येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता टाटा: एक विश्वास या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी नक्की भेटूया !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment